'पत्रास कारण की’ हा काव्यसंग्रह वाचताना असे वाटते की कवी आपल्याशी बोलत नाही, तर स्वतःशीच बोलत आहे आणि त्या संवादाचा साक्षीदार आपण होत जातो. या कविता कुणाला समजावण्यासाठी लिहिलेल्या नाहीत, ना कुणाला पटवण्यासाठी. त्या जन्माला येतात त्या केवळ जगता-जगता असह्य झालेल्या प्रश्नांमधून, अस्तित्वाच्या कड्यावर उभ्या असलेल्या मनाच्या थरथरीतून. या कवितांमधील आर्तता गाजवणारी नाही; ती कुजबुजणारी आहे. लवथवणाऱ्या झाडांच्या पानासारखी सतत हलणारी, पण मोडून न पडणारी. म्हणूनच या दशकातील मराठी कवींचा विचार करताना सतीश सोळांकूरकर यांचे नाव घ्यावे लागते ते त्यांच्या खाजगी व्याकुळतेला काव्यात्मक प्रामाणिकतेने सामोरे जाण्याच्या धैर्यामुळे. या कविता ‘पत्रे’ होतात. स्वतःला लिहिलेली, पण कुणाच्याही मनात उघडता येणारी. ती निर्मम आहेत, कारण त्या खोटे दिलासे देत नाहीत. त्या प्रांजळ आहेत, कारण त्या सजावटीच्या शब्दांआड लपत नाहीत. करुणेच्या वाऱ्याने या कवितांतील पत्रे तडतडतात; आणि त्या तडतडीतून जो आवाज येतो, तोच या संग्रहाचा खरा सूर आहे. ‘पत्रास कारण की’ वाचताना एक क्षण असा येतो, की आजूबाजूचा सगळा पाचोळा.. थकवा, अपयश, गोंधळ, नात्यांची गर्दी अचानक दिसू लागतो. आणि त्या पाचोळ्यातून या कवितांच्या ओळी हळूच वर येतात. काही कविता जगण्याच्या झुळकीसारख्या अंगाला लागतात. त्या मनाला थोडे हलके करतात, थोडे अस्वस्थही. त्या गात नाहीत; पण त्यांची अंतर्लय मनात रेंगाळत राहते. हे केवळ कवितांचे सामर्थ्य नाही, तर कवीच्या नितळ जगण्याचेही प्रतिबिंब आहे. सतीश सोळांकूरकर यांची कविता आपल्याच तालात फुलते. ती मोठा आवाज करत नाही, कुणाचे लक्ष वेधण्यासाठी हात हालवत नाही. ती फुलते कारण तिला फुलावेसे वाटते. हा साधेपणा, ही आत्मविश्वासातून आलेली शांतता, आजच्या गोंगाटात फारच दुर्मीळ आहे. कधी कधी मात्र कवी मनावर काव्यात्म ताण घेत प्रतिमांची अतिशय दाट गुंफण करतो. ती गुंफण सुंदर असते, पण तिच्या असंबद्धतेतून गूढतेचा आभास निर्माण होतो. अशा वेळी कविता थोडी दूर सरकते. हा धोका ओळखणे महत्त्वाचे आहे, कारण सतीश सोळांकूरकर यांच्याकडे छंदबद्ध रचनेचे सामर्थ्य आहे. प्रत्येक माणसाचे आंतरिक फुलणे वेगळे असते ते कुणाला दिसत नाही, पण आत खोलवर घडत असते. ‘पत्रास कारण की’ हा त्या फुलण्याचा प्रवास आहे. हा प्रवास कवीचा असला, तरी तो वाचताना आपल्यालाही आपल्याच आत डोकावावेसे वाटते. आणि हीच या संग्रहाची खरी ताकद आहे. म्हणूनच ‘पत्रास कारण की’ हा संग्रह केवळ कवितांचा संच न राहता, मनुष्याच्या एकाकी पण प्रामाणिक अस्तित्वाचा काव्यात्मक दस्तऐवज बनतो. -दिलीप भोसले