शूरवीर सरदार शिदनाक :- गुलामगिरीविरुद्धच्या लढ्याचा विस्मरणग्रस्त नायक भारतीय इतिहासातील काही घटना केवळ युद्ध म्हणून नव्हे, तर सामाजिक सत्तासंबंध बदलणारा निर्णायक टप्पा म्हणून समजून घ्याव्या लागतात. १ जानेवारी १८१८ रोजी झालेले इंग्रज–पेशवे युद्ध हे असेच एक ऐतिहासिक वळण आहे. प्रस्थापित इतिहासाने या युद्धाचे श्रेय बहुतांशी इंग्रज सेनाधिकार्यांना दिले असले, तरी या लढ्याच्या केंद्रस्थानी उभे असलेले बहुजन नेतृत्व दीर्घकाळ दुर्लक्षित राहिले. या विस्मरणावर ठोस प्रहार करणारा आणि इतिहासाच्या कडेला ढकलल्या गेलेल्या योद्ध्याला केंद्रस्थानी आणणारा ग्रंथ म्हणजे दिनकर काकडे लिखित शूरवीर सरदार शिदनाक होय. हा ग्रंथ केवळ एका शूरवीराचे चरित्र नाही, तर तो अस्पृश्यतेविरुद्धच्या ऐतिहासिक बंडाचा वैचारिक दस्तऐवज आहे. इतिहासात १ जानेवारी १८१८ चे युद्ध अनेकदा “इंग्रज विरुद्ध पेशवे” या चौकटीत मांडले जाते. मात्र लेखक दिनकर काकडे या सरलीकरणाला आव्हान देतात. त्यांच्या मते, हे युद्ध महार समाजावर शतकानुशतके लादलेल्या अमानुष गुलामगिरीविरुद्धचे युद्ध होते. रस्त्यावर थुंकू नये म्हणून गळ्यात मडके, पावले न उमटावीत म्हणून कमरेला झाडू अशा अपमानास्पद प्रथांमध्ये जगणाऱ्या समाजाचा आत्मसन्मान या युद्धाच्या मुळाशी होता. या पार्श्वभूमीवर शूरवीर सरदार शिदनाक यांचे नेतृत्व आकार घेते. पेशव्यांकडून युद्धापूर्वी झालेला अपमान हा केवळ व्यक्तिगत नव्हता, तर संपूर्ण महार समाजाच्या अस्मितेवर केलेला घाला होता. त्यामुळे शिदनाक यांनी पेशव्यांची साथ सोडून इंग्रज कॅप्टनकडे जाण्याचा निर्णय घेतला, हा देशद्रोह नसून आत्मरक्षणाचा आणि स्वातंत्र्याचा राजकीय निर्णय होता, हे लेखक ठामपणे अधोरेखित करतात. या युद्धात महार बटालियन सरदार शिदनाक यांच्या नेतृत्वाखालील शूरवीर ५०० सैनिकांनी २८,००० पेशवाई सैन्याचा पराभव केला. हा विजय केवळ सैनिकी कौशल्याचा नव्हता, तर आत्मतेज, स्वयंप्रेरणा आणि गुलामी झुगारण्याच्या जिद्दीचा होता. दिनकर काकडे या लढ्याचे वर्णन करताना शौर्याचे उदात्तीकरण करत नाहीत; तर उलट, ते सामाजिक वास्तवाशी जोडतात. त्यामुळे हा विजय पेशवाईच्या पराभवापुरता मर्यादित राहत नाही, तर तो ब्राह्मणी सत्तेच्या नैतिक अधःपतनाचे प्रतीक ठरतो. सरदार शिदनाक यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या विजयामुळे पेशवाईचा अंत झाला. त्याचबरोबर अस्पृश्य व बहुजन समाजावर लादलेली गुलामगिरी सैल झाली. लेखक अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक दुवा जोडतात. या मुक्तीच्या अवकाशातूनच पुढे महात्मा जोतिराव फुले यांच्यासारखा युगपुरुष उभा राहू शकला. म्हणूनच लेखक स्पष्टपणे मांडतात की, शूरवीर सरदार शिदनाक यांनी सामाजिक स्वातंत्र्याचा पाया घातला, महात्मा जोतिराव फुले यांनी शैक्षणिक-सामाजिक क्रांती उभारली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून त्या क्रांतीला सुवर्णकळस चढवला. ही त्रिसूत्री लेखकाच्या इतिहासदृष्टीचे वैचारिक केंद्र आहे. ग्रंथाची रचना तीन भागांत विभागलेली असून ती अभ्यासकांना क्रमिक समज देणारी आहे. भाग १ – महार समाजाची उत्पत्ती आणि शूद्र–अस्पृश्यतेची ऐतिहासिक निर्मिती भाग २ – महार समाजाच्या शौर्याचा ऐतिहासिक मागोवा भाग ३ – शूरवीर सरदार शिदनाक यांचे नेतृत्व आणि १ जानेवारी १८१८ चे निर्णायक युद्ध ही रचना ग्रंथाला केवळ चरित्रात्मक न ठेवता समाजशास्त्रीय आणि इतिहासलेखनात्मक चौकट प्रदान करते. अभिजन इतिहासकार महार समाजाने इंग्रजांची बाजू घेतली म्हणून देशद्रोहाचा आरोप करतात, यावर लेखक ठामपणे प्रश्न उपस्थित करतात. शतकानुशतके सत्तेच्या जवळ राहून इंग्रजांशी तडजोड करणाऱ्या अभिजन वर्गाने आत्मपरीक्षण करावे, ही भूमिका लेखक निर्भीडपणे मांडतात. त्यामुळे हा ग्रंथ केवळ इतिहास सांगत नाही, तर इतिहास कसा लिहिला जातो यावरही टीका करतो. शूरवीर सरदार शिदनाक हा ग्रंथ इतिहासातील एका विस्मरणात गेलेल्या योद्ध्याला न्याय देतो. तो आपल्याला हे शिकवतो की, समाजाच्या कल्याणासाठी संसारावर तुळशीपत्र ठेवून झटणाऱ्या व्यक्तींचे ऋण समाजाने कधीही विसरू नये. हा ग्रंथ वाचताना वाचक केवळ माहिती मिळवत नाही, तर त्याच्या मनात कर्तव्यबुद्धी, सामाजिक ऋणाची जाणीव आणि परिवर्तनाची प्रेरणा निर्माण होते. म्हणूनच हा ग्रंथ इतिहास अभ्यासक, विद्यार्थी, संशोधक आणि सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी अनिवार्य ठरतो. -दिलीप भोसले