Dehadansh

Dehadansh


Book Preview


₹120.00 ₹150.00
Price in USD: $1.37

‘देहदंश’ – स्वीकाराची आणि सजगतेची कथा.. "काही जखमा या फक्त अंगावर उमटत नाहीत... तर त्या आत्म्यावर खोल कोरल्या जातात..." ‘देहदंश’ एक शब्द. पण त्यामागे खोल खोल विरलेली आहे वेदना, स्तब्धता, धक्का, समाजाचे दुर्लक्ष, आणि त्या सगळ्यावर मात करत नवे आयुष्य उभारू पाहणाऱ्या जिद्दीची असामान्य कहाणी! डॉ. राजश्री पाटील या केवळ लेखिका नाहीत, तर त्या एक संवेदनशील वैद्यकीय व्यावसायिकही आहेत. त्या दररोज अशा रुग्णांशी संवाद साधतात, त्यांच्या डोळ्यातील पाणी आणि मनातली आर्तता अनुभवतात. त्या वेदनेला त्यांनी लेखणीच्या साक्षीने आकार दिला आहे... आणि ‘देहदंश’ या कथासंग्रहातून ती वेदना आता शब्दरूपाने आपल्यासमोर उभी ठाकते आहे. निःसंकोच, निखळ, नि:शब्दपणे आत भिडणारी. एचआयव्ही/एड्स – एक काळ होता, जेव्हा या शब्दाने समाज भयभीत होत असे. रोग्याच्या देहाइतकाच त्याचा ‘देहदंश’ समाजमनात खोलवर झिरपत असे. शरीरापेक्षा आधी मनं दगड होई. कटाक्षांची धार जास्त बोचरी वाटत असे. ही कहाणी केवळ विषाणूची नाही... तर ही कहाणी आहे रोग्याच्या आत्म्यावर झालेल्या त्या जखमांची.. या कथांमधून एकेक व्यक्तिरेखा फुलत जाते. श्वेता, शरद, मंजू, सुषमा, मेघा... या कोणीही काल्पनिक वाटत नाहीत. त्या आपल्या शेजारच्या, नात्यातल्या, कधी आपल्याच अंतर्मनातल्या आहेत. या सर्व कथा केवळ वैद्यकीय निदानावर थांबत नाहीत. तर त्या समाजाच्या दुभंगलेल्या दृष्टीला, दोषी अशा अवहेलनांना आणि मानवी नात्यांमधल्या प्रामाणिक संघर्षांना समोर आणतात. ‘धवल प्रतिमा’ या कथेत समाजाचा अविश्वास, एका शिक्षकाचा आत्मघात, आणि एक बदललेला रिपोर्ट या त्रिकुटातून लेखिका प्रश्न उभा करतात, "आपण किती सजग आहोत? आणि किती सहृदय?" ‘Yes, It is my own life’ ही कथा आजच्या तरुणाईचा आरसा आहे. स्वैरतेच्या आणि सजगतेच्या मधोमध अडकलेले जगणे, आणि वेळेवर मिळालेली जाणीव.. जीवनाच्या वळणांवर फक्त माहिती नव्हे, तर संवाद कसा महत्वाचा असतो, हे ती सांगते. ‘देहदंश’ हा केवळ एक कथासंग्रह नाही... तर तो एक अनुभव आहे. तो एका अशा पथकथांचा संग्रह आहे, ज्या समाजाला आरसा दाखवतात, आणि सांगतात, "रोग्यांपेक्षा अधिक धोकादायक आहे, आपली उपेक्षा, आपली अपुऱ्या माहितीवर उभारलेली भीती!" या संग्रहातून डॉ. राजश्री पाटील यांनी एक ‘पॉझिटिव्ह’ भूमिका मांडली आहे. शब्दशः आणि भावार्थानेही. हे पुस्तक वाचताना फक्त कथानक नव्हे, तर त्या मागचे समाजशास्त्र, मानसशास्त्र, आणि माणुसकीही समोर येते. कोणी चुकलंच, तर त्याचं काय? त्याला समाजाने टाकायचं? की समजून घ्यायचं? त्याच्या जखमांना मीठ चोळायचं? की त्यावर फुंकर घालायची? ‘देहदंश’ या कथासंग्रहाचे प्रत्येक पान हा एक अस्वस्थ करणारा पण सजग करणारा अनुभव आहे. यातून केवळ व्यक्ती नव्हे, तर आपला समाजही बदलू शकतो. मोकळा, अधिक स्वीकारणारा, अधिक सुसंवेदनशील होऊ शकतो. या फक्त कथा नाहीत, तर ही पुनर्रचना आहे.. एका दृष्टिकोनाची, एका सायलेन्सची आणि एका शक्यतेची. वाचकांसाठी एकच विनंती, वाचताना फक्त डोळ्यांनी वाचू नका... हृदय उघडं ठेवा. मन शरण ठेवा. कारण ‘देहदंश’ फक्त शब्दांत नाही...तर तो प्रत्येक पानावर श्वास घेतो आहे. ‘देहदंश’ स्वीकाराची आणि सजगतेची कथा आहे. कारण, रोग्याला नव्हे... तर समाजाला उपचाराची अधिक गरज आहे! -दिलीप भोसले

RELATED BOOKS