मराठवाड्यातील एक दमदार कथालेखक म्हणून जयराज खुने यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. सार्वजनिक बांधकाम खात्यात कार्यरत असलेले खुने सभोवतालच्या वास्तवाचे सूक्ष्मपणे निरीक्षण करतात. 'आगडोंब' उसळण्यामागील कारण मिमांसा शोधतात. 'माणूस' म्हणून जगण्यासाठी इथे फार मोठा संघर्ष करावा लागतो, व्यवस्थेने रचलेले व्यूव्ह छेदावे लागतात. हे सारे करताना अनेकदा कोलमडून पडू की काय अशी वस्तुस्थिती शिरजोर बनते. तिला नेटाने बाजूला सारण्याची सशक्ता खंबीरपणाने बांधावी लागते. विद्रोहाला चेतवावे लागते. त्याशिवाय खऱ्या अर्थाने साहित्याला अर्थच उरत नाही. खुने यांच्या कथेत वास्तवाला बिनधोक भिडण्याची सिद्धता आहे. अनेकविध प्रश्नांना कवेत घेण्याचे सामर्थ्य या कथालेखकात आहे. फुले- आंबेडकरी तत्त्वज्ञानाने अंधारवाटा उजळून टाकणारी सामाजिक बांधिलकी कथेच्या माध्यमातून कथालेखकाने अधोरेखित केलेली आहे. वर्तमानावर अत्यंत गंभीरपणाने भाष्य करणारी ही कथा वाचकांना अंतर्मुख करते. भाषेच्या दृष्टीनेही या कथेचे वेगळेपण लक्षणीय स्वरूपाचे आहे. डॉ. जगदीश कदम नांदेड